सुतार पक्षी, चिमणी, बेडूक तथा मशीसारख्या सामन्यांचा विरोध केल्यामुळे हत्तीसुद्धा नष्ट झाला होता.
एका जंगलात चटक आणि चटकी नावाचं एक चिमण्यांचं जोडपं एका हिरव्यागार तमालवृक्षावर घरटं बांधून रहात होतं. चटकीने एकदा घरट्यात अंडी घातली. एके दिवशी एक मस्तवाल हत्ती कडक उन्ह टाळण्यासाठी त्या झाडाखाली आला. आपल्या शक्तीच्या मस्तीत त्याने ज्या फांदीवर चिमण्यांचं घरटं होतं तिचं फांदी आपल्या सोंडेत धरून तोडून टाकली.
फांदी तुटल्यामुळे घरटं खाली पडलं आणि त्यातली सगळी अंडी फुटली. साहजिकच चटकी रडू लागली. तिचं रडणं ऐकून तिचा मित्र सुतार पक्षी म्हणाला “कशाला रडतेस? जे गेलं त्यासाठी रडू नये. आपल्याला आपल्या ताकदीला साजेसं जीवन जगायचं असतं!”
हे ऐकून चटक म्हणाला “तुझं म्हणणं बरोबर आहे. पण शक्तीच्या मस्तीत त्या हत्तीने जो गुन्हा केला त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी. तू माझा खरा मित्र असशील तर मला त्याला शिक्षा द्यायचा मार्ग सुचव. मगच आमची पिल्लं गमावल्याचं दुःख कमी होईल!”
सुतार पक्षी त्याच्या मैत्रिणीकडे, म्हणजेच वीणारवा नावाच्या माशीकडे गेला. तिला त्याने सर्व हकीकत सांगितली. माशी त्याला घेऊन मेघनादकडे, म्हणजेच तिच्या एका बेडूक मित्राकडे गेली. सगळ्यांनी चर्चा करून हत्तीला धडा शिकवायची एक युक्ती ठरवली.
मेघनाद माशीला म्हणाला “वीणारवी ! उद्या दुपारी तू हत्तीच्या कानात जाऊन तुझी गोड गुणगुण कर. त्यात गुंग होऊन तो आपले डोळे मिटून घेईल. आणि त्याच क्षणी सुतारपक्षी आपल्या टोकदार चोचेने त्याचे डोळे फोडून टाकेल. आंधळा झाल्यावर तो जेंव्हा पिण्यासाठी पाणी शोधेल, तेंव्हा मी एका खोल दरीजवळ जाऊन जोरजोरात ओरडेन. माझ्या आवाजाने तो जवळ पाणी आहे असे समजून तिथे येईल, आणि दरीत पडून मरून जाईल.
अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून एका भल्यामोठ्या हत्तीलाही आपल्या चातुर्याने मारून टाकलं.
म्हणूनच म्हणतात की अंगात शक्ती कमी असली तरी बुद्धीचा वापर करून बलवान शत्रूचा पराभव करता येतो