वर्धमान नावाच्या एका नगरीत दंतील नावाचा एक खूप मोठा व्यापारी संपूर्ण नगराचा प्रमुख बनून राहत होता. त्याने उत्तम प्रकारे परोपर आणि लोकहिताची कामे करून त्या नगरात राहणार्या लोकांना आणि राजाला खुश केले होते. त्याच्या सारखा दूसरा, राजा आणि प्रजा दोघांचाही लाडका असलेला चतुर पुरुष, कोणी कधी ना पहिला होता, ना कोणी, अशा व्यक्ती बद्दल ऐकलं होतं.
काही काळानंतर दंतीलचा विवाह झाला. विवाह प्रसंगी त्याने सार्या नगरवासीयांना आणि राजसभेतील लोकांना मोठ्या सन्मानाने निमंत्रण देऊन बोलावलं आणि भोजन, वस्त्र आदि द्वारे त्यांचा सत्कार केला. विवाहापश्चात त्याने राण्यांसह राजाला आपल्याकडे बोलावून त्याचा सत्कार केला परंतू त्या राजाच्या घरी साफसफाई करणारा गोरंभ नावचा राजसेवक घरी आल्यावर दंतील ने तो अयोग्य जागी बसल्याच्या कारणावरून घरातून बाहेर काढलं. त्या दिवसापासून अपमानित झालेला गोरंभ उसासे टाकत रात्र रात्र जागा राही आणि कशा प्रकारे या दंतीलवरची राज कृपा हटवता येईल याचाच विचार करत राही.
एके दिवशी सकाळी जेव्हा राजा जरासा झोपेत होता तेव्हा त्याच्या पलंगाजवळ झाडलोट करता करता गोरंभ म्हणाला, "काय बोलायचं बाबा! हा दंतील इतका धीट की राणीसाहेबांना आलिंगन देतो."
हे ऐकल्यावर राजा धडपडून जागा झाला आणि त्याला म्हणाला, "गोरंभ! तू जे आत्ता बोललास ते खरं आहे? महाराणीला दंतील ने आलिंगन दिलं?" गोरंभ म्हणला, "देवा! रात्री जुगार खेळत होतो त्यामुळे मी रात्रभर जागा होतो. त्यामुळे आता मला येतेय झोप. त्यामुळे मला नाही माहीत मी काय बडबडलो."
राजाच्या मनात मत्सराची भावना निर्माण झाल्यामुळे तो मनातल्या मनात म्हणाला, "हा आपल्या घरात थेट येतो जातो याला कोणीच अडवत नाही आणि दंतीलही तसाच येत जात असतो. हे शक्य आहे की याने कधीतरी दंतीलने महारणीला आलिंगन देताना पहिलं असेल."
अशा तर्हेने राजा दुःखी झाला आणि त्या दिवसापासून दंतीलापासून फटकून राहू लागला. राजवाड्यात त्याला प्रवेशही नाकारण्यात येऊ लागला. अचानक राजाचा असा बदललेला व्यवहार पाहून दंतील विचार करू लागला, "मी तर राजाचं किंवा राजघरण्याशी संबंधित इतर कोणाचंच अनिष्ट चिंतिलं नाही. तर मग राजा माझ्यावर नाराज का आहे?
एके दिवशी राजदरबारच्या द्वारावर गप्प उभ्या असलेल्या दंतीलला पाहून गोरंभ हसून द्वारपालांना म्हणाला, "द्वारपालांनो! राजाच्या कृपेने दंतील अत्यंत समर्थ आहे. यांना थांबवलत तर माझ्या सारखे तुम्हालाही धक्के खावे लागतील."
हे ऐकल्यावर दंतील विचार करू लागला. "ही नक्कीच या गोरंभाची करणी असणार. राज सेवकाचा मान राखायलाच हवा कारण तो कोणाकडूनही पराभूत होत नाही."
रात्री दंतीलने गोरंभाला घरी बोलावले तिथे त्याला भेटवस्तू देऊन त्याचा सन्मान करून तो त्याला म्हणला, "भल्या माणसा, मी तुला त्या दिवशी रागाने बाहेर काढले नव्हते तर तू चुकीच्या ठिकाणी बसला होतास म्हणून तुझा राग केला. मला क्षमा कर."
सुंदर भेटवस्तू आणि सन्मानामुळे संतुष्ट झालेला गोरंभ म्हणाला, "मी ते सगळं माफ केलं. या सन्मानाच्या बदल्यात तू माझं बुद्धीचातुर्य आणि राजकृपा काय असते ते पहा."
दुसर्या दिवशी गोरंभ राज गृहात जाऊन म्हणाला, "आमचे महाराज मोठे थोर आहेत, पण असला कसला वेडेपणा ते करतायत कोणास ठाऊक, परसाकडे जातात आणि मल विसर्जन करताना काकड्या खातात!" हे ऐकल्यावर राजा चकित होऊन म्हणाला, "अरे गोरंभा तुझ्या जिभेला काही हाड! काहीही काय बरळतोयस? घरगडी आहेस म्हणून फटके खाण्यापासून वाचलास. काय रे तू मला हे असलं कर्म करताना कधी रे बघितलंस?
गोरंभ म्हणाला, "मालक मालक क्षमा करा. अहो काल रात्रभर जुगार खेळत बसल्यामुळे झोप लागली आणि त्याच भिरकीत चुकून काहीतरी भलतंच बोलून गेलो.
हे ऐकल्यावर राजा विचारात पडला, "मी तर उभ्याआयुष्यात कधीही शौचाला गेलो असताना काकड्या खाल्ल्या नाहीत. पण हा मूर्ख मात्र हे असं भलतंसलतं सहज बोलून गेला. बहुतके याने अशाच प्रकारे दंतीलवरही खोटे आरोप लावले असणार. मी नाहक त्याच्या सन्मानाला ठेच पोचवली.
असा विचार करून राजाने दंतीलला राजमहालात बोलावलं. त्याचा यथोचित सन्मान केला. आणि त्याला त्याचे पूर्वीचे सगळे अधिकार परत दिले.
म्हणूनच म्हणतात, गर्वाने उन्मत्त होऊन कधीही दुसर्याचा अपमान करू नये.