श्रीकृष्णाच्या हातून झालेल्या कंसाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी क्रोधाने आंधळा झालेल्या जरसंधाने मथुरेवर हल्ला करायचे ठरवले.
जरसंधाने आपल्या सेनेसह मधुरेला घेरले आणि श्रीकृष्ण-बालरम दोघांना युद्धाचे आव्हान दिले. मथुरावासीयांनी श्रीकृष्ण आणि बालरम दोघांचा पराक्रम या पूर्वीही पाहिला होता त्यामुळे ते निश्चिंत होते.
श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनी आपल्या यादव सेनेला जरसंधाच्या सेनेसमोर आणून उभे केले. मगधाच्या सेनेचे संख्याबळ जास्त असले तरी तिच्याकडे कृष्णबलरामाच्या सेने सारखे युद्ध कौशल्य नव्हते.
जेव्हा जरासंध आणि बलराम दोघांचा एकमेकांशी सामना झाला तेव्हा जरासंधाला बलराम एक असा कोवळा तरुण वाटला जो त्याच्या समोर अजिबातच टिकू शकणार नाही... म्हणूनच जरासंधाने बलरामाला द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले. जरासंधासोबत द्वंद्व युध्द करण्यासाठी उतावीळ झालेल्या बलरामाला पाहून श्रीकृष्णाच्या चेहर्यावर हसू पसरलं. दोन्ही योद्धा लढू लागले आणि काही वेळातच बलरामाने जरसंधाला परास्त केले.
बलराम, जरासंधाला जमिनीवर आपटून आता आपल्या गदेने त्याच्यावर प्रहार करणार तोच त्याला हाक ऐकू आली, "दादा थांबा"
चकित होऊन बलरामाने आपल्या छोट्या भावाकडे श्रीकृष्णाकडे पहिलं आणि जरासंधाच्या छातीवर पाय ठेऊन श्रीकृष्णाला विचारलं, "तुझा नक्की हेतू काय आहे. आज मी याचा काल बनून याचं जीवन समाप्त करू शकतो, तर मग तू मला का थांबवतो आहेस?"
हसतहसत श्रीकृष्ण उत्तरला, "आपण नुकताच याच्या जावयाचा वध करून याच्या मुलींना विधवा केलं आहे त्यामुळे त्याचं असं संतापणं रास्त आहे. याला शहाणपण शिकण्यासाठी आपण अजून एक संधी दिली पाहिजे"
असं अर्ध्यात थांबवल्यामुळे बलराम चिडला होता पण त्याचा श्रीकृष्णाच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास होता. बलरामाने आपली गदा खाली घेतली आणि जरासंधाच्या छातीवरून आपला पाय बाजूला करून रागाने म्हणाला, "माझा विचार बदलायच्या आत जेवढा लांब जाऊ शकतोस तेवढा लांब निघून जा..."
जरासंध त्याचा असा अपमान झाल्यामुळे सूडाच्या भावनेने अधिक पेटून उठला. त्याच बरोबर तो हा धडाही शिकला की आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या शत्रूला कमी लेखून चालणार नाही... त्यानंतर तो श्रीकृष्णाच्या सगळ्या शत्रूंच्या भेटी घेऊ लागला. ज्यात प्रमुख होते जरासंधाचा मित्र शाल्व, श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ पौंड्रक, श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा शिशुपाल आणि निषाद राज्याचे राजा आणि एकलव्याचे पिता दन्तवक्र हे सगळे श्रीकृष्ण आणि बलरामाचा वध करण्याच्या उद्देशाने जरासंधाला मदत करण्यासाठी एकत्र आले.