जरासंध मगध देशाचा राज्यकर्ता होता आणि श्रीकृष्णाच्या जीवनाशी त्याचा घनिष्ठ संबंध होता. या कथेत आपण जरासंधाविषयी आणि श्रीकृष्णाशी असलेल्या त्याच्या नात्याविषयी जाणून घेणार आहोत
मगधेवर जेव्हा राजा बृहद्रथ राज्य करत होता तेव्हा त्याची प्रजा खूप खुश होती. बृहद्रथाचा विवाह काशीच्या जुळ्या राजकुमारींशी झाला आणि तो एका आनंदी गृहस्थ जीवनात बांधला गेला... जस जसा काळ पुढे सरकत होता तशी राजाच्या मनात पुत्र प्राप्तीची इच्छा वाढू लागली.
अखेर बृहद्रथने निर्णय घेतला आणि त्याने आपल्या दोन्ही पत्नींना त्या विषयी सांगण्यासाठी बोलावले. तो म्हणाला, "प्रियांनोन, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका, आपली पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वन-गमन करण्याचा निर्णय घेतला आहे." बृहद्रथाचे बोलणे ऐकून राण्यांना खूपच धक्का बसला परंतु त्यांनी बृहद्रथाचं म्हणणं मान्य केलं.
राजाने आपलं राज्य सोडलं आणि जंगलाचा मार्ग स्वीकारून पायी चालत तो चंडकौशिक ऋषींना शरण गेला. राजानं मनोभावे ऋषींची सेवा करण्यास प्रारंभ केला आणि आपली कर्तव्य संपूर्ण निष्ठेने निभावली. ऋषी त्यांच्या समर्पणाने खूपच प्रसन्न झाले आणि ते राजाला म्हणाले, "हे राजन! मी तुझ्या समर्पणावर प्रसन्न झालो आहे. तू एक राजा असूनही निकृष्ट दर्जाची कामंही मन लावून केलीस... मी तुला एक वरदान देऊ इच्छितो. सांग तुझी काय इच्छा आहे?"
राजा बृहद्रथ चंडकौशिक ऋषींना वंदन करून म्हणाला, "हे ऋषीवर! मी एक निपुत्रिक राजा आहे. मला फक्त एक पुत्र हवा. जो माझ्या राज्याचा वारस बनेल. बस्स माझी एवढीच एक इच्छा आहे. मला पिता व्हायचं आहे . हे ऋषीश्रेष्ठ! मला संतान प्राप्तीचं वरदान द्या."
ऋषींनी राजावर दयाभाव दाखवत त्याला एक फळ दिलं आणि सांगितलं की हे फळ तुझ्या कोणत्याही एका पत्नीला दे. राजा ते दैवी फळ घेऊन वनातून आपल्या महाली परत आला. राजाला आपल्या दोन्ही पत्न्याना आनंदित झालेलं पाहायचं होतं. म्हणून त्याने त्या फळाचे दोन समान भाग केले आणि आपल्या दोन्ही पत्न्याना दिले. तत्पश्चात त्या दोघींच्या पोटी अर्धी-अर्धी मृत मुलं जन्माला आली.
हे दृश्य पाहून राजा आणि राणींना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना ते खूपच घाबरले. राजाने आपल्या शिपायांना आदेश दिला "ही दोन्ही अर्धी शरीरे घेऊन जा आणि राज्याच्या बाहेर फेकून द्या."
मगध राज्याबाहेर जरा नामक राक्षसीला ती दोन्ही अर्धी शरीरं सापडली. ज्या क्षणी तिने ते दोन भाग वर उचलले त्याक्षणी ते दोन्ही भाग आपापसात जोडले गेले आणि त्यातून एक मूल जीवंत होऊन ते रडू लागलं. जराला एका निर्दोष बालकाची हत्या करायची नव्हती. म्हणून तिने ते मूल राजाला परत दिलं आणि घडलेला चमत्कार सांगितला. जरा राक्षसीच्या नावावरूनच राजाने आपल्या मुलाचं नाव जरासंध असं ठेवलं.