नीलकंदरहून परत आल्यावर बरेच दिवस झाले होते. सबर नगरीत
विश्वावसू आणि अवंती नगरीत राजा इंद्रद्युम्न पुन्हा त्यांच्या आराध्य दैवताचं
दर्शन घेण्यासाठी आतुर झाले होते. एका रात्री भगवान नीलमाधव इंद्रद्युम्नाच्या
स्वप्नात आले. प्रथमच आपल्या परमेश्वराची निळी मूर्ती आणि अलौकिक तेज
पाहून राजासुद्धा भक्तीभावाने न्हाऊन निघाला.
नीलमाधव यांनी आता राजाला योग्य वेळ आल्याची सूचना दिली. ते
म्हणाले, “माझ्या श्रेष्ठ भक्त इंद्रद्युम्ना, तू परत उत्कलच्या राज्यात जा. तेथे
समुद्राच्या किनाऱ्यावर पाण्यामध्ये तरंगणारा एक लाकडी ओंडका सापडेल.
त्यापासून माझी, माझा बंधू बलरामाची आणि भगिनी सुभद्रा अशा त्रीमूर्ती
करवून घे. त्याच समुद्राच्या काठावर एक भव्य मंदिराची निर्मिती कर. तिथे
विधिवत पूजा कर. कलियुगाचा अंत आणि कल्की अवतार संपेपर्यंत हा निळा
समुद्रकिनारा ‘निलांचल’ हेच माझं स्थान असेल. तुला हे कार्य माझा आद्य
सेवक विश्वावसू याच्या मदतीने पूर्णत्वाला न्यावं लागेल.